हायमास्ट लाईट कोसळल्याने टळली मोठी दुर्घटना; प्रशासन अजूनही झोपेत!
आमगाव – शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी (दि. ७) सकाळी ७ वाजता एक ट्रक थेट हायमास्ट लाईटच्या खांबावर आदळला. या अपघातात हायमास्टचा खांब पूर्णपणे वाकून जमिनीवर कोसळला. दुर्दैव टळले कारण अपघाताच्या वेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.
या घटनेनंतर आमगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ट्रक चालकाला ताब्यात घेतले, मात्र खांब घटनास्थळी तसाच पडून आहे. चार दिवस उलटले तरी पालिकेच्या प्रशासनाचे डोळे उघडलेले नाहीत. लाखो रुपयांचे नुकसान झाले असूनदेखील प्रशासनाची उदासीनता धक्कादायक आहे.
पडलेला खांब नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळा ठरत असून, रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी आणि वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होऊ शकते, मात्र तरीही प्रशासन निष्क्रिय आहे.
घटनेनंतर पोलिसांनी आपले काम केले, मात्र नगरपालिका आणि संबंधित विभाग मात्र गप्प बसले आहेत. नागरीकांमध्ये संतापाची लाट आहे. "हा खांब उचलण्यासाठी किती जीव जाणे आवश्यक आहे?" असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.
जर त्वरित उपाययोजना न झाल्यास, भविष्यातील कोणत्याही अपघाताला जबाबदार प्रशासनच असेल. ही निष्क्रियता ही फक्त बेपर्वाई नाही, तर जनतेच्या जिवाशी केलेली खेळ आहे.