"दोन मिनिटांचा फरक... आणि नागपूरचं कुटुंब मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावलं ...

 "दोन मिनिटांचा उशीर झाला असता तर...; बैसरन व्हॅलीतील दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले नागपुरचे रुपचंदानी कुटुंब"



नागपूर/पहलगाम – "दोन मिनिटांचा उशीर झाला असता, तर आमचं काय झालं असतं हे कल्पनाही करवत नाही…" अशा थरारक आठवणींमध्ये गुंतलेल्या नागपूरच्या रुपचंदानी कुटुंबाने जम्मू-काश्मीरच्या बैसरन व्हॅलीतील हल्ल्यातून थोडक्यात जीव वाचवला. मंगळवारी पहलगामजवळ झालेल्या अचानक दहशतवादी गोळीबारात त्यांनी मृत्यूला सामोरे जाण्याचा भयानक अनुभव घेतला.

जरीपटका, नागपूर येथील सिमरन रुपचंदानी या आपल्या पती तिलक आणि मुलासोबत पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या होत्या. मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅलीच्या सौंदर्याचा आनंद घेत असताना, अचानक झालेल्या गोळीबाराने संपूर्ण परिसर हादरून गेला. “फक्त किंकाळ्या आणि गोंधळ… आमचं काय होणार याची कल्पनाही नव्हती,” असे सांगताना सिमरन यांच्या डोळ्यांतल्या भीतीची छाया अजूनही स्पष्ट जाणवत होती.

गोळ्यांचा आवाज सुरू होताच पर्यटकांनी जीव वाचवण्यासाठी डोंगराकडे धाव घेण्यास सुरुवात केली. रुपचंदानी कुटुंबानेदेखील घोड्यावरून उतरत जीव मुठीत घेऊन पळायला सुरुवात केली. मात्र पळताना सिमरन यांचा पाय घसरून दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला. तरीही पती तिलक यांनी संयम राखत त्यांना सावरलं आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं.

“आम्ही जर त्या ठिकाणाहून दोन मिनिटं उशिरा निघालो असतो, तर गोळ्या आमच्यावरही झाडल्या गेल्या असत्या,” असे सांगताना त्यांच्या आवाजात हादरलेल्या मनाची झलक स्पष्ट होती. त्यांच्या पतीने सांगितले की, "त्या क्षणी फक्त माझी बायको आणि मुलगा सुरक्षित राहावा हेच डोक्यात होतं. गोळ्या कुठून येत होत्या हेच कळत नव्हतं."

या घटनेच्या वेळी त्या परिसरात चार ते पाच हजार पर्यटक होते. एक्झिट गेट अत्यंत छोटा असल्यामुळे गोंधळ वाढला आणि लोकांची धावपळ सुरू झाली. काही पर्यटकांचे नातेवाईक गर्दीत हरवले, पण त्यांना परत शोधायला जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच होतं.

सध्या सिमरन यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना विश्रांती घ्यावी लागणार आहे. मात्र त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने परमेश्वराच्या कृपेने या जीवघेण्या प्रसंगातून वाचल्याची भावना व्यक्त केली आहे.

या घटनेमुळे पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला असून हल्लेखोरांच्या शोधासाठी ऑपरेशन राबवण्यात येत आहे.जगण्यासाठी दोन मिनिटं पुरेशी असतात, हे अनुभवून आलेल्या नागपूरकरांनी आता आयुष्य नव्याने जपण्याचा निर्धार केला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post