नागपुरात 2200 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक; गुप्तचर विभाग सतर्क
"नागपुरात 2200 पाकिस्तानी नागरिकांची वस्ती; गुप्तचर यंत्रणा अलर्ट मोडवर!"
नागपूर (NAGPUR)उपराजधानी नागपुरात सध्या 2200 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. हे नागरिक व्यवसायाच्या निमित्ताने नागपुरात राहत असल्याचं सांगितलं जातं. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभाग अत्यंत सतर्क झाला असून या नागरिकांची सखोल चौकशी सुरू आहे.
गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, काही पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा कालबाह्य झाले असूनही ते नागपुरातच वास्तव्यास आहेत का, याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, हे नागरिक कोणत्या प्रकारच्या व्यवसायात गुंतले आहेत, त्यांचे भारतात येण्यामागील नेमके उद्दिष्ट काय होते, याचीही चौकशी करण्यात येत आहे.
या संदर्भात स्थानिक पोलिस यंत्रणेसोबत केंद्रीय गुप्तचर विभाग समन्वय साधत असून सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यात आली आहे. नागपुरातील काही संवेदनशील भागांत विशेष देखरेख ठेवण्यात येत आहे. पाकिस्तानातील नागरिकांच्या उपस्थितीमुळे स्थानिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
ही संपूर्ण कारवाई राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात असून लवकरच यावर केंद्र सरकारकडून अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.