पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तणाव –BSF जवान चुकून पाकिस्तानमध्ये गेला

 पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तणाव – फिरोजपूरमध्ये BSF जवान चुकून पाकिस्तानमध्ये गेला



चंदीगड – जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढलेला असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. फिरोजपूरमध्ये सीमा सुरक्षादलाचा (BSF) एक जवान चुकून झिरो लाईन ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेला आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले असून यामुळे सीमेलगत पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे.

ही घटना बुधवारी सकाळी घडली. शेतकरी गहू कापणीसाठी फेंसिंगजवळील गेट क्रमांक 208/1 जवळ गेले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी दोन BSF जवान तैनात होते. याच दरम्यान, एक जवान चुकून झिरो लाईन पार करून पाकिस्तानमध्ये गेला. पाकिस्तान रेंजर्सनी त्याला अटक केली असून त्याचे शस्त्रही काढून घेतले आहे.

घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जवानाची सुरक्षित सुटका करण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्स आणि भारतीय अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मीटिंग सुरु आहे. श्रीनगरहून BSF ची बटालियन-24 ममदोट येथे दाखल झाली आहे.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बीएसएफ जवानाची अटक ही अतिशय संवेदनशील बाब बनली आहे.सरकार जवानाला सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. लवकरच तोडगा निघेल आणि जवान मायदेशी परत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

Previous Post Next Post